नागरिकांना मिळणार मालकी हक्क
परळी: आठवडा विशेष टीम―शहरातील गंगासागर नगर, सिद्धेश्वर नगर भागातील मोठ्या जागेवर नगर पालिकेने १७ वर्षापुर्वी टाकलेले आरक्षण विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नामुळे हटविण्यात आले असून या भागातील शेकडो नागरीकांना आता आपल्या घराचा मालकी हक्क मिळणार असल्याची माहिती प्रभाग क्रं.५ चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी दिली.
शहरातील गंगासागर नगर, सिद्धेश्वरनगर, बरकतनगरच्या पाठीमागील भाग या सर्व भागावर नगर पालिकेने १७ वर्षापुर्वी आरक्षण टाकल्याने या भागातील नागरीकांचीही जुणी मागणी होती. आरक्षण असल्यामुळे या भागात वस्ती वाढत असतांना नागरीकांना मात्र मालकी हक्क मिळत नव्हता. यामुळे शासनाच्या अनेक योजना बरोबरच इतर कामासाठीही नागरीकांना वंचित रहावे लागत होते. या भागातील नागरीकांच्या या मागणीचा विधानपरिषद विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी गांभीर्याने विचार करत न.प.प्रशासनाला या भागातील आरक्षण हटविण्या बाबतच्या सुचना दिल्या होत्या. यानुसार परळी न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे, न.प.गटनेते वाल्मीक कराड यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करत सदरील आरक्षण उटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या भागातील नागरीकांना न.प.कडून पी.टी.आर. उतारे मिळणार आहे. १७ वर्षापासूनचा हा प्रश्न मार्गी लागल्याने या भागातील नागरीकांची मोठी समस्या दुर झाली असल्याचे प्रभाग क्रं.५ चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी सांगितले.