औरंगाबाद- पाण्याविना माकडांचा सोयगाव परिसरात मृत्यू; जरंडी,रावेरी शिवारात पंचनामे

सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावच्या जंगलाच्या पायथ्याशी वसलेल्या वनविभागाचे कोरडेठाक झालेले पाणवठे आणि जंगलातील पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे सोयगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील वन्यप्राण्यांचे भवितव्य धोक्यात आले असून पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या पाच माकडांचा गुरुवारी दुपारी तडफडून मृत्यू झाल्याच्या घटना सोयगाव परिसरात विविध भागात उघडकीस आल्या आहे.दरम्यान वनविभागाच्या पथकाकडून या घटनांचा पंचनामा करण्यात आला आहे.
सोयगाव परिसरातील विविध भागात पाण्याच्या शोधात आलेल्या माकडांच्या टोळक्यातील पाच माकडांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.सोयगाव भागातील वनविभागाचे अस्तित्वात असलेले कृत्रिम पाणवठे दोन महिन्यापासून कोरडेठाक झाले आहे.त्यातच जंगल भागात पाण्याचा स्रोत मंदावल्याने वन्यप्राण्यांची तहान घशातच अडकून आहे.वनविभागाकडून कृत्रिम पाणवाठ्यात टँकरद्वारे पाणी टाकण्याचा उपक्रम हाती घेतला होता,परंतु अचानक पाण्याच्या दुर्भिक्षाने हा उपक्रम ठप्प झाला आहे.जरंडीच्या जंगल भागात वन्यप्राण्यांनी काही कालावधीत स्थलांतर केले,परंतु या भागातील विहिरींचे व शेततळ्यांच्या पाण्याने निच्चांकी गाठल्याने या ठिकाणीही दुर्भिक्ष झाले आहे.दरम्यान शेती शिवारात येवूनही वन्यप्राण्यांना तहान भागविता आली नसल्याने पाच माकडांनी प्राण सोडला आहे.