परळी (प्रतिनिधी): राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री ना.सौ.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.सौ.प्रीतमताई मुंडे यांच्या सुचनेवरून कंपनीने सन 2017 चा परळी तालुक्यातील 15 गावांचा खरीप विमा बॅंकेकडे वर्ग करण्यात आला असून परळीच्या मार्केट यार्ड शाखेतून 23 जानेवारी 2019 पासून या खरीप विम्याचे वाटप होणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक नितीन जीवराज ढाकणे यांनी दिली. यामुळे दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठी मदत उपलब्ध होणार आहे.
परळी तालुक्यातील अस्वलआंबा, दे.टाकळी/गोपाळपुर, दौनापुर, इंजेगाव, कौठळी, लिंबुटा, मांडेखेल, माळहिवरा, नाथ्रा, नागपिंपरी, पांगरी, सोनहिवरा, तळेगाव, तडोळी व वानटाकळी या गावातील शेतकऱ्यांचा सन 2017 चा खरीप विमा मागील वर्षभरापासून प्रलंबित होता. दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना हा पिक विमा मिळणे अत्यंत महत्वाचे होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेवून राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी विमा कंपनीला सुचना देत हा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे. सुमारे 3 कोटी रूपये एवढी पिक विम्याची रक्कम असून भवानीनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मार्केट यार्ड शाखेतून या पिक विमा रक्कमेचे वाटप होणार आहे.
परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.पंकजाताई मुंडे यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर नितीन ढाकणे यांनी ही संचालक या नात्याने आपला पाठपुरावा चालूच ठेवला होता. ना.पंकजाताई मुंडे यांनी विमा कंपनीला थेट सुचना देत तातडीने खरीप विम्याची रक्कम बॅंकेकडे वर्ग करण्याची सूचना केली होती. त्यानुसार रक्कम आता जमा झाली असून 23 जानेवारीपासून या रक्कमेचे वाटप शेतकऱ्यांना होणार आहे.दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार असल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.