विभागीय आयुक्तांनी आदेश देवूनही अंबाजोगाई तहसील न्याय देईना
अंबाजोगाई : तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील गट नं.27 या शेतीचा परंपरागत नंबर बांध आणि वहीवाटीचा रस्ता हा शेजारील शेतकर्यांनी फोडल्याने व त्या ठिकाणी अनाधिकृत रित्या शेततळे तयार केल्याने भगवान लिंबाजी पैठणकर या शेतकर्यास त्याच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात जाण्यास रस्ता राहिला नाही.या बाबत सदरील शेतकर्याने मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी निवेदने,अर्ज करूनही अद्याप या शेतकर्यास न्याय मिळाला नाही. गेल्या 1 वर्षापासुन या शेतकर्यास खरीप आणि रब्बीची पेरणी करता आलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्याने थेट विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना या बाबत निवेदन देवून न्याय न मिळाल्यास सहकुटुंब सामुहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला.विभागीय आयुक्तांनी या प्रश्नी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी बीड यांना सदर प्रकरणात कारवाई करणे बाबत सुचित केले. जिल्हाधिकारी बीड यांनी तहसीलदार अंबाजोगाई यांना व तहसीलदार अंबाजोगाई यांनी मंडळ अधिकारी पाटोदा (म.) यांना स्मरणपत्र दिले.सदर मंडळ अधिकार हे चालढकल करत आहेत. एवढे होवूनही या शेतकर्याला दुसर्या वर्षाच्या खरीपाची पेरणी जवळ आली तरी अद्यापही स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, उपआयुक्त (महसुल) डॉ.विजयकुमार फड, जिल्हाधिकारी बीड यांनी लेखी सुचना व आदेश देवून ही अंबाजोगाई येथील तहसीलदार,मंडळ अधिकारी पाटोदा (म.) हे या प्रश्नी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत. यामुळे नाहक एका गरीब शेतकर्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.सदर शेतकरी हा मानसिकदृष्ट्या तणावात आहे.ज्या शेतकर्यांनी हा परांपरागत नंबर बांध व वहीवाटीचा रस्ता
आडवुन अनाधिकृतरित्या शेततळे तयार केले आहे.ते शेतकरी हे राजकिय वरदहस्त असलेले आहेत. त्यामुळेच की,काय नंबर बांध व वहीवाटीचा रस्ता अडवणा-या शेतकर्यांनी पोलिस व महसुल प्रशासन यांना हाताशी धरून भगवान लिंबाजी पैठणकर या शेतकर्यास त्याच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात जाण्यास आडवणूक करीत आहेत.या प्रश्नी सदर शेतकर्यास तात्काळ न्याय मिळाला नाही.तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलिस व महसुल प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल व भगवान लिंबाजी पैठणकर या शेतकर्यास न्याय मिळवून देण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले यांनी दिला आहे.