बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

आयुष्यातील क्षण न् क्षण कुटूंबापेक्षा जनतेच्या सेवेसाठी―पंकजाताई मुंडे

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी परळीत येऊन बहिणीला दिली ताकद ; गणेशपारची पारंपारिक सभा जोरदार

उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस परळीत येऊन बसली तरी पंकजाताईंचा विजय कुणी रोखू शकत नाही

परळी दि.१८:आठवडा विशेष टीम― पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज परळीत येऊन पंकजाताई मुंडे यांना ताकद दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पंकजाताई काम करत आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस इथे येऊन बसली तरी पंकजाताईंचा विजय कुणी रोखू शकत नाही असे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोधकांना ठणकावले. दरम्यान, मी माझ्या आयुष्यातला क्षण न् क्षण कुटूंबापेक्षा जनतेच्या सेवेसाठी अर्पण केला आहे, मुंडे साहेबांचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे त्यासाठी मला साथ द्या असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी उदयनराजे भोसले आज परळीत आले होते, गणेशपार येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, डाॅ. अमित पालवे, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, अॅड. यशःश्री मुंडे, प्रा. टी पी मुंडे, राजेश देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, माजी आमदार विजय गव्हाणे, अक्षय मुंदडा, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, शिवसेनेचे व्यंकटेश शिंदे, राजेश विभूते, रिपाइंचे नेते भास्कर रोडे, उत्तम माने, सुधाकर पौळ, सुरेश माने, वृक्षराज निर्मळ, बालासाहेब कराळे, भरत सोनवणे, संतोष सोळंके आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना उदयनराजे म्हणाले, मुंडे साहेबांनी लोकं जोडण्याचं काम केलं. माझ्या वडीलांचं ज्यावेळी माझ्यावरचं छत्र हरपलं त्यावेळी मुंडे साहेबांनी वडीलांचं छत्र माझ्यावर धरलं. मी वाट चुकलो असं कोणीतरी स्टेजवर भाषणात म्हणालं. पण मी सांगतो आज मुंडे साहेब असते तर ही वेळ आली नसती. आता मुंडे साहेबांचं स्वप्नं पुर्ण करण्याचं काम माझ्या दोन्ही भगीनी (पंकजाताई आणि प्रीतमताई) करीत आहेत.

भाजपने विकास केला तर राष्ट्रवादीने भांडणे लावली

मुंडे साहेबांचं स्वप्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचं काम होत आहे. दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसण्याचं काम मोदी साहेब मराठवाडा वॉटरग्रीडच्या माध्यमातून करीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीकडे पंधरा वर्षे सत्ता होती या काळात त्यांनी काय विकास केला? आमच्या भागातील कृष्णा खोरे योजनाही स्व.मुंडे साहेबांनी मार्गी लावली. पंधरा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीने केवळ जातीजातीत भांडणं लावण्याचं काम केलं आहे. मराठा आरक्षण म्हणू म्हणू आमचं कान पिळवटून गेले पण यांनी आरक्षण काही दिलं नाही. आणि हे काम महायुतीच्या सरकारने केलं, असेही उदयनराजे म्हणाले. मोदींना भारताला महासत्ता करायचे आहे. त्यासाठी महायुतीच्या पाठीमागे उभा राहून माझ्या बहीणीला तुम्ही निवडून द्या, असे आवाहनही उदयनराजेंनी केले.

प्रत्येक क्षण जनतेसाठी- ना.पंकजाताई

गोपीनाथ मुंडे हे नाव परळीची आन, बाण आणि शान आहे, ते नाव वाढविण्यासाठी मी काम करीत आहे पण काही लोक हे नाव मिटविण्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन करून वाइट काळात लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना धोका देणारे जनतेला काय साथ देणार? असा सवाल करून मी जेवढी उच्च पदावर जाईल तेवढा जास्त विकास करीन असेही ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या. विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत पण मी माझ्या कुटुंबापेक्षाही जनतेच्या सेवेला वेळ देते. मी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही पण जनता जनार्दनासमोर कायम नतमस्तक राहिले आणि राहणार आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वडीलांना पक्ष बदलायला लावणारे जनतेशी कसे बांधिलकी सांभाळतील असा सवाल त्यांनी केला.
माझी लढाई कोणा व्यक्ती विरोधात नाही तर वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. मी कुणाचे वाईट केले नाही आणि करणारही नाही त्यामुळे खोटे पाया पडण्याची खऱ्या धमक्या देण्याची मला गरज नाही. मी बांधलेल्या रस्त्यावर किंवा सभागृहाबाहेर उभे राहून विरोधक माझ्यावर टीका करीत आहेत माझा अर्धा प्रचार तेच करीत असल्याचे सांगून राष्ट्रवादी हे बुडते जहाज आहे, त्यात बसायला कुणीही तयार नाही त्यामुळे तुम्हीही मत वाया घालू नका असे त्या म्हणाल्या. “देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला” ही म्हण आपण बदलू असे सांगून “देव आला द्यायला आणि पदरही आहे घ्यायला” अशी करायची आहे. परळीत आपली सत्ता नसतानाही विकासाला निधी कमी पडू दिला नाही. परळीला स्मार्ट सिटी करायचे आहे असे सांगून शहराच्या आणि मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या पारंपारिक सभेला गाव भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button