मोहाली(पंजाब) : विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने पंजाबचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधला सात सामन्यातील हा पहिलाच विजय आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबने बंगलोरसमोर विजयासाठी १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. विराट आणि ए बी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकामुळे आरसीबीने हे आव्हान दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार पाडले.कोहलीने ५३ चेंडूत ६८ तर एबी डिव्हिलियर्सने नाबाद ५८ धावांची खेळी उभारली.
त्या आधी ख्रिस गेलच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने बंगलोरसमोर १७४ धावांचे आव्हान ठेवले होते. ख्रिस गेलची ६४ चेंडूत नाबाद ९९ धावांची खेळी हे पंजाबच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. गेलच्या या खेळीत दहा चौकार आणि पाच सिक्सचा समावेश होता.
आरसीबी कडून यजुवेंद्र चहलने दोन तर मोईन अली आणि मोहम्मद सिराजने एक-एक विकेट घेतली.