सोयगाव,ता.२३: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात तीनही मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद बुधवारी करण्यात आली असून तालुक्याची पावसाची सरासरी एक हजार झाली आहे.दरम्यान परतीच्या अतिवृष्टीच्या पावसात खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून तब्बल ३२ हेक्टरवरील कपाशी पिके पाण्यावर तरंगत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालेला असतांना प्रशासानाकाकडून पंचनाम्यांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सोयगावसह तालुक्यात तीन दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असतांना मंगळवारी दिवसभर व रात्री त्यानंतर बुधवारी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,कापणी करून ठेवलेल्या मका पिकांना शेतातच कोंब फुटले आहे,कपाशी पिकांना झाडावरच कापूसमध्ये कोंब आले असल्याचे बुधवारी शेतकऱ्यांचा लक्षात आले त्यामुळे पहिल्याच कापूस वेचानीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तब्बल ३२ हजार हेक्टरवरील पिके पाण्यावर तरंगत असतांना,मात्र महसूल आणि कृषी विभागाकडून बघ्याची भूमिका घेण्यात येत आहे.पंचनाम्यांसाठी आता प्रशासनाकडून विधानसभेच्या मतमोजणीच्या प्रक्रियेत कर्मचारी अडकल्याची कारण पुढे करण्यात येत आहे.मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेतून सुटलेल्या कर्मचाऱ्यांकडून पंचनाम्यांची तसदी महसूल विभागाकडून घेण्यात येत नाही.