आठवडा विशेष|प्रतिनिधी
बीड दि. 26:- दुष्काळी परिस्थितीमध्ये बळीराजाला आधार देण्यासाठी यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पालवन संचलित तुकाराम गुरुजी गोधाम प्रकल्प पालवन येथे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मंजूर झालेल्या पशुधन राहत व चारा छावणीचे उद्याटन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास खा.डॉ.प्रितम मुंडे,आ. सुरेश धस,मा.आ. बदामराव पंडीत, मा.आ राजेंद्र जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युध्दाजित पंडित, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, महिला व बालकल्याण सभापती उध्दवराव दरेकर, अनिल जगताप,रमेश पोकळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती पंकजा मुंडे यांनी स्वत: छावणी मध्ये फिरुन दाखल झालेल्या जनावरांची पाहणी करुन संबंधितांशी चर्चा केली तसेच गोपूजन करुन त्या म्हणाल्या की, पशुधन हे शेतकऱ्यांची संपत्ती आहे. या छावण्यांमध्ये 4 हजार पशुधन दाखल झाले असून आपण समर्थपणे या दुष्काळाचा सामना करुन मुक्या जनांवरांची चारा व पाण्याची उत्तम व्यवस्था करु, शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता आपली जनावरे या छावणीमध्ये दाखल करावीत, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
मराठवाडयाच्या 5 जिल्हयांतील 5 संस्थाना शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुधन राहत व चारा छावण्या मंजूर झाल्या असून बीड जिल्हयातील हि पहिलीच चारा छावणी आहे. जिल्हयाला 128 कोटीचा निधी मंजूर झाला असून तो लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना 57 कोटी रुपयांचे भाडंवल वाटप करण्यात आले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुरेश धस व रमेश पोकळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेद्रं मस्के यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
या कार्यक्रमास शेतकरी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.