लिंबागणेश:आठवडा विशेष टीम―भटक्या विमुक्त जमातींतील रायरंद नावारुपाला आलेले खाकी वर्दी घालुन पोलिस असल्याची बतावणी करत करमणुक करुन पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पोखरी शिवारात वास्तव्यास आलेल्या आणि गावकुसाबाहेर पाल ठोकलेल्या शिंदे कुटुंबांना पहाटेच्या सुमारास गावचे सरपंच यांनी तुम्हाला इथं रहाता येणार नाही म्हणत पाल उचलुन जाण्यास सांगितले, त्या सर्वांकडे तपासणी करण्यात आलेले वैद्यकीय रिपोर्ट आणि प्रवासाचा पास सुद्धा होता. जिथं अगोदर रहात होते मौजे गवळवाडी येथिल सरपंचाने तुम्हाला २ महीने खायला घातले आता यापुढे नाही तुम्ही दुसरीकडे निघून जा, म्हणल्यानंतर ते नेहमीच्या ठिकाणी रहायला आले होते.
सुरेश सावळा चव्हाण , बहुरुपी
सुरेश सावळा चव्हाण ,गाव नेकनुर या अगोदर गवळवाडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथुन दरवर्षी प्रमाणे पोटापाण्यासाठी, कामधंदा करून पोट भरावे म्हणून पोखरी शिवारात गावाच्या बाहेर रहायला रात्री आलो होतो.पण गाववाले राहु दिनात सरपंचाला सांगुन परत जायला सांगितले.म्हणुन परत चाललो.
कल्पना सुरेश चव्हाण
आम्ही रायरंद हाईत, पोटापाण्यासाठी इथं रहायला आलो, पण इथं सरपंच राहू दिनात.इथले सरपंच म्हणतेत जिथुन आला तिथं जावा.सरकारने आमच्या पोटापाण्याची ,खायला अन्न आणि राहण्यासाठी जागा द्यावी.
छबाबाई सावळा शिंदे
आमी रायरंद हाईत, पोट भरण्यासाठी इथं आलतो इथली लोकं दरवरसा परमाने मदत करतील खायला,परतायला देतील,पोट भरतील.पण सकाळी गाववाले म्हणलं इथं रहायचं नाही,मग आता जातोय.
सावळा धर्मा शिंदे ,बहुरुपी
पोट भरण्यासाठी इथं आलतो, गवळवाडीचे सरपंच म्हणाले २ महिने खायलाप्यायला दिले आता यापुढे माझी ऐपत नाही, तुम्ही दुसरीकडे पोट भरण्यासाठी जावा म्हणुन इथं पोखरी शिवारात गावकुसाबाहेर पाल टाकलं होतं.पण इथलं गाववाले आणि सरपंच म्हणले इथं राहायचे नाही, म्हणुन चाललोय.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते लिंबागणेश
७ मे २०२० रोजी मी मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री मा. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, मा. छगनजी भुजबळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री, समाज कल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री, मा. धनंजयजी मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना मा.राहुलजी रेखावार , जिल्हाधिकारी आणि मा.अजितजी कुंभार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती की भटक्या विमुक्त जमातींच्या लोकांना ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत ते राहतात येथिल ग्रांमपंचायतने त्यांना मोफत धान्य व इतर जीवनोपयोगी वस्तू वाटप कराव्यात व त्यासाठी लागणारा खर्च जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत दिलेल्या ऊसतोड मजुरांप्रमाणेच त्यांना लाकडाऊन कालावधी संपेपर्यंत करावा.तरच यांची पोटापाण्यासाठी भटकंती व स्थलांतरामुळे होणारी फरफट थांबण्यास मदत होईल आणि उपासमार घडणार नाही.
―डॉ.गणेश ढवळे
मो.नं.९४२००२७५७६