आठवडा विशेष|प्रतिनिधी
परळी वैजनाथ: सुधाकर किसन काळे (वय ५८) यांनी रात्रीच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या वाटसरूंना सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर तात्काळ याबाबत सिरसाळा पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
परळी तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथील शेतकरी सुधाकर किसन काळे (वय ५८) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. विविध बँकांचे त्यांच्याकडे कर्ज होते. सततची नापिकी आणि दुष्काळ यामुळे हे कर्ज आता फिटणार कसे? या विवंचनेत ते होते. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिट्टीत लिहून ठेवल्याचे कळले आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राला ४७०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतरही ही राज्यातली पहिली आत्महत्या आहे. मयत सुधाकर काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली सून आणि नातवंडे असा परिवार आहे.