आठवडा विशेष|प्रतिनिधी
पारनेर : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेला पारनेरमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या वेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निलेश लंके यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. निलेश लंके यांनी शिवसेना सोडली… धनंजय मुंडे यांनी भाजपा सोडली… मी देखील शिवसेना सोडली… आजही मला अनेक जण विचारतात की, तुम्ही शिवसेना का सोडली ? त्यांना मला सांगायचे आहे, अपेक्षाभंग होतो म्हणून आम्ही पक्ष सोडला, असे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी पारनेरच्या सभेत सांगितले. ‘’आज त्याच शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मला विचारायचे आहे की, तुम्ही ज्यांना चोर म्हणता त्यांच्यासोबत सत्तेत काय करताय,’’ असा सडेतोड सवाल करतानाच छगन भुजबळ यांनी इतकी वर्षे इथे शिवसेनेची सत्ता असूनही पारनेरच्या जनतेला साधं पाणीही मिळू शकलेलं नाही, याबद्दल संतापही व्यक्त केला.
निलेश लंके यांच्या पाठी लोकांची ऐवढी मोठी ताकद आहे, हे पाहून मला आजच वाटू लागले आहे की, पारनेरमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मोदी सरकार नोकरी देत नाही उलट म्हणतंय पकोडे विका, दोनशे रुपये कमवा आणि शांत बसा. ” मोदीजी लोकांना हा रोजगार अपेक्षित नव्हता. लोकांना वाटलं होतं कारखाने येतील, नव्या कंपन्या येतील त्यातून रोजगार मिळेल. पण असे काहीही झाले नाही” , अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.