बीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

बीड जिल्हयातील विविध विकास कामांमुळे येणाऱ्या काळात जिल्हयाचा कायापालट होण्यास मदत होणार – पंकजा मुंडे

बीड, दि.०१ प्रतिनिधी :- जिल्हयात शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या विकास कामामुळे येणाऱ्या काळात जिल्हयासह परळी मतदार संघाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा शुभारंभ व पांगरी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास फुलचंद कराड, नामदेवराव आघाव, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, रमेश कराड, संजय मुंडे, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता विष्णू वाघमोडे, उपअभियंता एस. यु. खंडारे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून परळी मतदार संघासह जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या विकास कामामुळे जिल्हयासह परळी मतदार संघाचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठयाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून कामे सुरु असलेल्या गावातील नागरिकांचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणारआहे.
जिल्ह्यातील विविध विकास कामांबरोबरच शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी प्राधान्य देण्यात येत असून बीड जिल्हा परिषद इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थान बांधकामे सुरू असून ही कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. जिल्ह्यात रस्ते विकास, शाळा बांधकाम, दवाखान्याचे बांधकाम, पशुसवंर्धन दवाखाने, आरोग्य केंद्र बांधकाम, अंगणवाडी खोल्या बांधकाम, डिजिटल शाळा, गाव अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, सभागृहाचे बांधकाम यासारखी विविध विकास कामेही हाती घेण्यात आली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना खेळते भांडवलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध देण्यात आले असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले
परळी तालुक्यातील तळेगाव येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी ७६ लक्ष १८ हजार रुपयाचा निधी मंजूर असून ही योजना मार्च आखेर पूर्ण होणार आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. तसेच तळेगाव येथील सभागृहासाठी खासदार फंडातून १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासह गावातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.पांगरी येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत ८९ लक्ष २३ हजार रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते येथे संपन्न झाले.

यावेळी फुलचंद कराड, शिवाजीराव गुट्टे यांचे समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास तळेगाव व पांगरी येथील भीमराव मुंडे, त्र्यंबक तांबडे, शांताबाई कुंडलिक मुंडे, प्रियंका तांबडे, गयाबाई मुंडे, श्रीहरी घुगे, सुधाकर पौळ, ज्ञानोबा मुंडे, विनायकराव मुंडे, पुष्पा मुंडे,महादेव मुंडे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button