मंचर (प्रतिनिधी) दि ०३: राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज मंचरमध्ये दाखल झाली .बैलगाडा शर्यत चालू करणार असे आश्वासन इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले होते.मात्र अजूनही बैलगाडा शर्यत चालू झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेत बसवा आम्ही बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ, कायद्यात काय तरतूद करायची आहे ते आम्ही बघू तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार यांनी मंचर येथील परिवर्तन यात्रेत केले. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांसाठी आ. दिलीप वळसे पाटील यांनी खासगी कारखाना काढाला. गेली पाच वर्षे सांगितले जात आहे इथे रेल्वे येणार, विमान येणार पण कधी येणार हे सांगत नाही यामुळे तुम्हा लोकांचेच नुकसान होत आहे. तुम्ही वेगळे लोक निवडून देता म्हणून हे नुकसान होत आहे. इथे साधे रस्ते नीट नाही आम्ही सरकारमध्ये आलो तर इथले रस्ते नीट करू. नाही केले तर अजित पवारला पुन्हा इथे येऊ देऊ नका असे आव्हान अजितदादा पवार यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले आहे त्यांच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पत्र पाठवले आहे.. उपोषणासाठी शुभेच्छा पत्र..? असा सवाल देखील आ.अजित पवार यांनी यावेळी विचारला.