मुंबई दि.२५:आठवडा विशेष टीम― कोरोना महामारी च्या पार्श्वभूमी वर राज्यात कोविड रुग्णांसाठी सर्व रुग्णालयात 80 टक्के खाटा आरक्षित करण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र त्याच बरोबर बिगर कोविड रुग्णांसाठी 20 टक्के खाटा उपलब्ध ठेऊन त्यांना योग्य वेळी योग्य उपचार दिले पाहिजेत. कोरोना रोगाला घाबरून इतर रुग्णांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.बिगर कोविड रुग्णांना रुग्णालयात वेळेवर दाखल करून घेतले जात नाही;त्यांना योग्य वेळी औषधोपचार दिला जात नाही अगदी हृदय विकार आलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे उपचाराविना बिगर कोविड रुग्णांचे मृत्यू होत असून परिस्थिती अशीच राहिली तर कोरोना ने मृत्यू होणाऱ्या संख्येपेक्षा बिगर कोविड रुग्णांची मृत्यू संख्या अधिक होण्याचा धोका आहे असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिला.
बिगर कोविड रुग्णांना त्वरित उपचार रुग्णालयांनी द्यावेत याकडे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे जी रुग्णालये बिगर कोविड रुग्णांना दाखल करून उपचार करणार नाहीत त्यांची मान्यता रद्द करण्याची कठोर कारवाई करावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
ज्यांना कोरोना चा आजार नाही मात्र इतर आजार आहे अशा बिगर कोविड रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे रोज येत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान आज केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बिकेसी येथे उभारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. येथे कोविड रुग्णांवर उपचार होणार असले तरी येथे व्हेंटिलेटर ची सुविधा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यासाठी दुसरे कोविड आरोग्य केंद्र बिकेसी मध्ये उभारण्यात येत असल्याची माहिती वैदकीय अधिकाऱ्यांनी आपणाला दिल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.