मुंबई (वृत्तसंस्था): राज्यातील सहाही नदीखोर्याचा एकात्मिक जलआराखडा तयार केल्यानंतर त्या आधारावर राज्याचा एकात्मिक जलआराखडा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्य जलपरिषदेच्या सहाव्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्रजी व माझ्यासह मंत्री श्री चंद्रकांत पाटील, श्री सुभाष देसाई, श्री विजय शिवतारे आणि श्री दिवाकर रावते आणि अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.
सर्व विभागांचा एकत्रितपणे समन्वय साधून आणि सर्व खोर्यांच्या जलआराखड्याचा अभ्यास करून हा एकात्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. विद्यमान आणि प्रस्तावित पाणीवापराचा यात समग्रपणे अभ्यास करण्यात आला आहे. बिगर-सिंचन वापराच्या पाण्याचा यात लोकसंख्या आणि अन्य मापदंडांवर अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्येक नदी खोर्यातील पाण्याची उपलब्धता, पाणीवापर आणि शिल्लक पाणी याचे नियोजन २०३० पर्यंतचा विचार करून करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण व्यवस्थापन याचाही साकल्याने विचार यात करण्यात आला आहे.