अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई तालुक्यातील न उगवलेल्या सोयाबीन बियाणांची शेतक-यांना नुकसान भरपाई देवून बियाणे उत्पादक कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करा यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.दादासाहेब भुसे यांचेकडे करण्यात आली आहे.सदरील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबाजोगाईचे तहसीलदार यांना सोमवार,दिनांक 22 जून रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यात यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतू,बीज उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीमुळे व सरकारच्या दुर्लक्षामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे बाजारात विक्रीसाठी आले होते.सोयाबीन पे-यापैकी जवळपास 85% टक्के बियाणे हे उगवलेच नाही.सोयाबीन बियाणे हे न उगवल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.त्यात खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतक-यांनी बियाणे खरेदी केले होते.पण,बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतक-यांना फसवले आहे.ते सोयाबीन उगवले नाही.शेतक-यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी एकरी 10 हजार रूपयांची मदत करावी व बोगस बियाणे विक्री करणा-या कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशा मागण्या सदरील निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत,जिल्हा उपाध्यक्ष सुनिल जगताप,तालुका सचिव लक्ष्मण शिंदे,शाखा अध्यक्ष सागर किर्दंत आदींच्या स्वाक्ष-या आहेत.