सोयगाव,दि.२५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आगामी खरीप हंगामात शेती पेरण्याच्या चिंतेने शेतातच अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना माळेगाव(पिंपरी)ता.सोयगाव येथे घडली.शेतकऱ्याला आगामी हंगामासाठी बियाणे आणि खतांची चीत्ना ग्रासून होती.आधीच डोक्यावर कर्जाचे ओझे आणि नवीन कर्ज मिळत नसल्याने या कर्जबाजारी शेतकऱ्याने थेट शेतात जावून विषारी औषध प्राशन केले आहे.या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र अद्याप महसूलच्या विभागाने घटनेचा पंचनामा केलेला नाही.
रवींद्र तुकाराम साळवे(वय ३५)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या शेतकऱ्यावर खासगी बँकांचे दोन लाख चाळीस हजार कर्ज असून कर्ज फेडण्याची विवंचना त्यातच आगामी हंगामात शेती पेरण्याच्या चिंतेत या शेतकऱ्याने मृत्यूला जवळ केले.शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत पात्र असूनही खात्यावर माफीची कर्जाची रक्कम जमा झालेली नसल्याने खरीप हंगामासाठी बँका त्याला खरीपासाठी कर्ज देण्यास नकार देत होत्या,पिककर्जासाठी या शेतकऱ्याने बँकांमध्ये चकरा मारल्या परंतु तुम्हाला अद्यापही कर्ज देता येत नसल्याचे उत्तर बँकांकडून मिळाल्याने या शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असल्याचे मृत शेतकऱ्याच्या आईने सांगितले.या घटनेमुळे माळेगाव,पिंपरी परिसरात खळबळ उडाली असून लॉकडाऊनच्या काळात कपाशीला योग्य भाव मिळत नव्हता,कपाशी विक्रीसाठी होणारी हेळसांड आणि खरीपासाठी हातात रक्कम नसल्याने या शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या आईने सांगितले.
महसूलचा पंचनामा नाही-
या घटनेचा अद्याप महसूल विभागाने पंचनामा केलेला नसून घटनास्थळावर कोणताही अधिकारी व कर्मचारी अद्त्यापही फिरकलेला नाही.या घटनेप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतूची नोंद करण्यात आली आहे.सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येवून शोकाकुल वातावरणात माळेगाव पिंपरी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.