सोयगांव दि.०४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― शहरात नगर पंचायत च्या ढिसाळ व अनियंत्रित कारभारामुळे सोयगावकरांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेताळवाडी धरण दोन महिन्यांपासून ओव्हरफ्लो होऊन सोना नदी दुथडी वाहत आहे त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत झाली आहे .कुठे सहा तर कुठे आठ दिवसापासून पाणी येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज मुख्याधिकारी मकसूद शेख यांची भेट घेत संताप व्यक्त केला.
सोयगाव शहरात नगर पंचायत मार्फत पाणी पुरवठा केला जातो. गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे.पुरेशी वीज मिळत नसल्याचे कारण पुढे करत नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. वेताळवाडी धरण दोन मिहिन्यांपासून ओव्हरफ्लो झाले असून सोना नदी दुथडी भरून वाहत . डोळ्यासमोरून पाणी वाहून जात असताना नळाला पाणी येत नाही. त्यामुळे धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत सोयगावकरांची झाली आहे. दररोज शेतात कामाला जायचे थकून भागून आल्यावर हातपंपावर पाणी भरायला जायचे हे नित्याचेच झाल्यामुळे नागरिक विशेषतः महिला प्रचंड संतापल्या आहे. त्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी मुख्याधकारी मकसूद शेख यांची भेट घेतली. पाणी का मिळत नाही या प्रश्नावर आक्रमक झलेल्या नागरिकांसमोर शेख यांनी पाणी पुरवठा कर्मचार्यांना बोलावून घेत जाब विचारला असता वीज मिळत नसल्याचे कारण कर्मचार्यानी पुढे केले. त्यावर लगेच उपअभियंता गौर यांना बोलावण्यात आले. आठ तास सुरळीत लाईट दिली जाते एखादयवेळेस तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो असे गौर यांनी सांगितले. माजी सरपंच वसंत बनकर, नरसेविका मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे राजेंद्र आहिरे ,रवींद्र काळे , राजेंद्र दुतोंडे, पुनामसिंग परदेशी , सुनील काळे ,विष्णू बडगुजर , रऊफ देशमुख ,अस्लम पिंजारी, संदीप चौधरी , रवींद्र काटोले, रऊफ शेख , आदींसह नागरिक यावेळी उपस्थित होते.
व्हाट्सअप ग्रुपवर माहिती द्या
पाणी पुरवठा कर्मचारी यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार करावा त्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार , नगरसेवक ,न मुख्याधिकारी ,महावितरण अधिकारी यांचा समावेश करीत दररोज पाणी पुरवठयाबाबत व निर्माण होणाऱ्या समस्येबाबत कळवावे अशा सूचना यावेळी मुख्याधिकारी मकसूद शेख यांनी दिल्या.
मासिक मिटींगच्या ठरावावर निर्णय होत नाही
मासिक मिटिंग मध्ये अनेकवेळा पाणी पुरवठयासाठी जनरेटर घेण्याबाबत सूचना केल्या परंतु त्यावर निर्णय होत नाही. कर्मचारी नीट सांगत नाही आणि ऐकत नसल्याचे नगरसेविका तथा पाणी पुरवठा सभापती मनीषा चौधरी यांनी खंत व्यक्त केली.