सोयगाव,ता.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कुटुंबावरील कर्जाचे ओझे अन रब्बी पिकांची झालेली वाताहत पाहून तरुण २७ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेवून जीवन यात्रा संपविल्याची घटना शहरातील आमखेडा भागात गुरुवारी सायंकाळी घडली.या प्रकरणी महसूल विभागाने आत्महत्येच्या घटनेची नोंद केली असून सोयगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सोयगाव तालुक्यात वाढत्या दुष्काळाच्या झळांनी मात्र शेतकऱ्यांची पुन्हा मानसिकता खराब झाल्याचे उघड झाले आहे.
सागर एकनाथ गोंड असे २७ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी पुत्राचे नाव असून कुटुंबावर कर्जाचे असलेले ओझे आणि त्याचा वसुलीचा तगादा असह्य झाल्याने शेतकरी पुत्राने रावेरी शिवारातील शेतातील गट क्र-४९ मधील निंबाच्या झाडाला गळफास घेत जीवन संपविले, आहे.सोयगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह झाडावरून उतरवून घटनेचा पंचनामा केला असून मृत शेतकऱ्याच्या मृतदेहावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरा आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्रावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव,सागर गायकवाड,शिवदास गोपाळ,दिलीप तडवी,आदि तपास करत आहे.
सोयगाव हळहळले-
तरुण शेतकरी पुत्राच्या आत्महत्येमुळे सोयगाव शहर हळहळले असून या घटनेचा शोकाकुल वातावरणात शोक व्यक्त करण्यात येत होता.मृत शेतकरी पुत्राला पत्नी,भाऊ,दोन मुले असा परिवार आहे.