महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. ते किती आणि कुठल्या जागा लढवतील, हे कळू शकलेलं नाही, पण मनसैनिकांचा ‘जोश’ आणि मतदारांचा विश्वास वाढवण्यासाठी रिंगणात उतरण्याची तयारी ‘कृष्णकुंज’वर सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा उद्या मनसेच्या तेराव्या वर्धापनदिनी राज ठाकरे स्वतः करतील. ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस(आय)-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
राज ठाकरे गेल्या एक-दोन वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर टीकेचे अस्त्र टाकत आहेत. जाहीर भाषणांमधून आणि व्यंगचित्रांमधून ते मोदी सरकारला वारंवार फटकारत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, बुलेट ट्रेन इथपासून ते अगदी पुलवामा हल्ला आणि ‘एअर स्ट्राईक’पर्यंतच्या घडामोडींवरून त्यांनी मोदी सरकारला थेट धारेवर धरले आहे. मोदी-शहा जोडीच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केले होते. या महाआघाडीत जायला ते तयार होते. राष्ट्रवादीचे नेते त्यांना आघाडीत घ्यायलाही तयार होते. परंतु, काँग्रेसनं ‘रेल्वे इंजीना’ला लाल कंदील दाखवला आणि ‘राजमार्ग’ खडतर झाला.
काँग्रेस(आय)-राष्ट्रवादीच्या नकार-होकारात बराच कालावधी गेला. तो पर्याय बाद झाल्यानं, आता पुढे काय, हा प्रश्न तमाम मनसे सैनिकांना पडला आहे. त्याचं उत्तर राज ठाकरे यांनी शोधलंय आणि ते उद्या स्वबळाचा नारा देऊ शकतात, असं सूत्राने सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेची चांगली ताकद आहे. राज यांनी अलीकडेच राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी अनेक भागांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे या लोकसभा विधानसभा निवडणूक रिंगणात न उतरल्यास या पाठिराख्यांचा उत्साह मावळू शकतो. कार्यकर्त्यांचं मनोबलही कमी होऊ शकतं. त्यामुळेच राज पुन्हा एकदा स्वतःची ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत.
२०१५ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही, रिंगणात उतरायचं का, याबाबत राज ठाकरे संभ्रमात होते. तेव्हा त्यांचा नरेंद्र मोदींना ‘शत प्रतिशत’ पाठिंबा होता. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपले मोजकेच शिलेदार मैदानात उतरवले होते. निवडणुकीत मोदी लाट उसळूनही मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली होती. ती या निवडणुकीत नक्कीच वाढतील आणि भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीला भक्कम आव्हान देता येईल, असं गणित मनसे नेतृत्वानं बांधलंय. जिथे मनसेचा उमेदवार नसेल, तिथे आघाडीच्या उमेदवाराला बाहेरून पाठिंबा देण्याची ‘राज’कीय खेळीही खेळली जाऊ शकते.