बीड:आठवडा विशेष टीम― संचारबंदीमुळे कुटुंबासह घरात असतांना त्याठिकाणी आलेल्या चौघांनी यांना ‘कोरोना झालाय, घराबाहेर काढा आणि गावाबाहेर हाकलुन द्या’ असे म्हणत मारहाण केल्याची घटना देवठाणा (ता.धारूर) येथे घडली. या मारहाणीमध्ये एकाचे कपाळ रक्तबंबाळ झाले असुन अन्य चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गावातीलच चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. धारूर तालुक्यातील देवठाणा येथील ऋषीकेश वाव्हळकर या तरूणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांपासुन मी आजी-आजोबाकडे राहत आहे. दि.६ एप्रिल रोजी आम्ही सर्वजण घरात असतांना त्याठिकाणी आलेल्या चौघांनी मोठमोठ्याने शिव्या देत यांना ‘कोरोना झाला आहे’ असे म्हणत सर्वजण घरात घुसले. जातीवाचक शिवीगाळ करून त्यानी मारहाण केली. या मारहाणीत माझ्या डोक्याला गंभीर दखापत झाली. घरातील आजी-आजोबा, मामी व मावशींनाही त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. ‘कोरोना झाला आहे अते म्हणत गावातच राहू द्यायचे नाही’ अशी धमकी देवुन पुन्हा शिवीगाळ केली. अशी तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी गावातीलच दादा उर्फ नारायण भगवान काशीद, पप्पु उर्फ जिजासाहेब काशीद, संतोष मोतीराम सोळंके आणि भगवान जिजासाहेब काशीद या चौघांविरूद्ध धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाच्या संशयाने झालेल्या मारहाण प्रकरणात पिडीत कुटुंबाला सरंक्षण देण्याची मागणी लढा मानव मुक्तीचा यांच्यावतीने करण्यात आली आहे.
आरोपींना अटक करून त्या कुटुंबाला पोलिस सरंक्षण द्या – डॉ.ओव्हाळ
धारूर तालुक्यातील देवठाणा येथील वाव्हळकर कुटुंबाला जातीय द्वेषातुन झालेली मारहाण निंदनीय आहे. कोरोनाचा संशय घेवुन घरास घुसुन मारहाण करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? असा प्रश्न उपस्थित करत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून वाव्हळकर कुटुंबाला पोलिस सरंक्षण द्या अशी मागणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी केली आहे.