मुंबई दि. 17 – पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज;आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा साथी; ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांच्या निधनाने सामान्य जनतेचा आधारस्तंभ;जनतेच्या प्रश्नांवर लढणारा रणझुंजार नेता हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवंगत प्रा. एन डी पाटील यांना
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिवंगत प्रा.एन डी पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील होते.त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार तरुणांना प्रेरणा देणारे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व राहिले आहे. जनतेच्या सेवेत त्यांनी स्वतःचे पूर्ण आयुष्य अर्पण केले. शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते.त्यांनी 18 वर्षे विधान परिषदेत आमदार म्हणून जनतेचा आवाज बुलंद केला. कोल्हापूर मधून ते विधान सभेत निवडून आले. महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणूनही प्रा एन डी पाटील यांनी काम केले.माझे त्यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध होते. दलित पँथर च्या काळापासुन ते आंबेडकरी चळवळीचे पाठीराखे सहानुभूतीदार आणि मार्गदर्शक साथी राहीले. पुरोगामी विचारवंत आणि जनतेच्या प्रश्नांवर लढणारा झुंजार नेता म्हणून मागील 7 दशकांच्या काळात प्रा. एन डी पाटील यांनी महाराष्ट्राला समृद्ध करण्यात अपले महान योगदान दिले आहे.त्यांच्या स्मृती महाराष्ट्र जोपासेल अशी भावना ना.रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.