महाराष्ट्र वैद्यकिय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेची मागणी
अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम―चतुर्थश्रेणी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करून सातवा वेतन आयोग लागू करावा.मागील 25 ते 30 वर्षांपासुन काम करत असताना देखील शासनाने सेवेत कायम करून घेतले नाही. कामाचे 240 दिवस पुर्ण होवूनही कायम करण्यासाठी शासनाच्या सर्व नियम व अटीत बसत असताना ही जाणून बुजून आमच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळणार नसेल तर सामुहिक आत्महत्येशिवाय पर्याय उरला नसल्याचा इशारा महाराष्ट्र वैद्यकिय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेने स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना शनिवार,दि.15 जून रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र वैद्यकिय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या 25 ते 30 वर्षांपासुन काम करूनही सेवेत कायम केले जात नाही.पाचवा, सहावा वेतन आयोग लागु केल्यानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रशासन जाणून बुजून चाल ढकल करत आहे. आमच्या सेवेचा योग्य मोबदला मिळणार नसेल तर स्वारातीचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर येत्या 1 तारखेस सामुहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र वैद्यकिय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा पुष्पाताई बिडवे, खजिनदार सुनिता पांडेकर,सल्लागार अंकुश शिंदे यांच्यासह संघटनेच्या सुमारे 70 हुन अधिक बदली कर्मचारी सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.