बीड:आठवडा विशेष टीम― देवस्थान आणि इनामी जमिनीचे क्षेत्र धारक शासकीय मदतीपासून वंचित आहेत. यापैकी शेती कसणाऱ्यांना इतर शेतकऱ्यांसारख्या सोयी सवलती का मिळत नाही ? असा प्रश्न जाटनांदुर शिरुरतील शेख समीर राजूभाई यांनी दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला असून वर्षानुवर्षांपासून इनामी आणि जहागीरी च्या जमिनी कसणाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळविण्यासाठी आपण लवकरच लढा उभारणार असल्याचे म्हटले आहे.
दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, जिल्ह्यात हजारो एकर शेतजमीन देवस्थान व इनामी क्षेत्र आहे. मात्र संबंधित शेत्र धारक कुठल्याही शासकीय मदती शिवाय या जमीनी कसत आहे. इतर शेतकऱ्यांना शेतीवर कर्ज, सोसायटी, कृषी विभागाकडून देण्यात येणारे फळबागा असे काही ना काही लाभ मिळत आहे. मात्र इनामी आणि जागिरीच्या जमिनीवरील शेतात घेतलेल्या पिकांना साधा पिक विमा दिला जात नाही. काही देवस्थान व इनामी क्षेत्राचे रजिस्ट्रेशन व कमेटी असलेल्यांना 2019 पर्यत पिक विमा दिला गेला, मात्र 2020 खरीप हंगाम पिक विमा योजनेपासून वंचित का ठेवले गेले ? हे समजले पाहिजे.
याकडे पालकमंत्री, खासदार, अामदार यांनी लक्ष घालुन देवस्थान व इनामी क्षेत्र धारकांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करून मोतीसहाब ट्रस्ट कमेटी जाटनांदुर ता. शिरुरचे अध्यक्ष समीर शेख (राजुभाई) यांनी याविषयी इनामी व जागिरी च्या जमिनी कसणाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच लढा उभारणार असल्याचे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.