शेतकरी विधेयकांच्या विरोधासाठी धरणे आंदोलन ; कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे-राजकिशोर मोदी यांचे आवाहन
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटी शुक्रवार,दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ‘किसान मजदूर बचाव दिवस’ पाळणार आहे.केंद्र सरकारने लादलेल्या 3 शेतकरी विधेयकांच्या विरोधासाठी तसेच ही विधेयके तात्काळ मागे घ्यावीत या मागणीसाठी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तरी या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे केंद्रातील शेतकरी विरोधी भाजपा सरकारने जी 3 विधेयके आणली.ती मागे घ्यावीत अशी मागणी करीत आहेत.यासाठी व्हिडीओ,फोटो,संदेश हे सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक,ट्विटर, इन्टाग्राम,युट्युब याच्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.या संघर्षात शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आवाहन करून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयका विरोधात 2 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.या बाबत बोलताना मोदी यांनी नमुद केले आहे की,काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांविरूद्ध 24 सप्टेंबर पासुन देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून शनिवार,दि.26 सप्टेंबर रोजी ‘स्पीक अप फॉर फार्मर्स‘ ही ऑनलाईन मोहिम राबविण्यात आली.भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.या विधेयकांच्या विरोधात एकिकडे लाखो शेतकरी व शेतमजूर रस्त्यांवर येऊन याला तीव्र विरोध करत असताना दुसरीकडे माञ हे निर्दयी सरकार माञ त्यांचा आवाज बंद करण्यासाठी लाठीमार करत आहे.या सरकारचा पूर्वानुभव पाहता ते संसदेसह कोणाशीही चर्चा वा संवाद न साधताच गरिब शेतक-यांवर कायदे लादत आहे.हे अन्यायकारक आहे.या पार्श्वभूमीवरच काँग्रेस अध्यक्षा मा.सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,प्रभारी यांच्या समवेत एक विशेष बैठक 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत शेतकरी विरोधी विधयके व त्याविरोधात संघर्ष करणा-या शेतक-यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 24 सप्टेंबर पासून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या आंदोलनाचे स्वरूप म्हणजे ऑनलाईन मोहीम,धरणे आंदोलन,स्वाक्षरी मोहीम होय.भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात,माजी प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार,दिनांक 2 ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सह्यांची मोहीम
काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत शेतकरी,शेतमजूर,बाजार समितीमधील दुकानदार आणि कामगार,कष्टकरी यांच्या सह्यांची मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेतून 2 कोटी सह्यांचे निवेदन तयार करण्यात येणार आहे.कोविडचे सर्व नियम व अटी पाळून गाव-खेडी,शहर,शेती येथे ही सह्यांची मोहिम राबविली जाणार आहे.सह्यांचे निवेदन हे बीड जिल्हा कमिटी मार्फत एकत्रित करून ते प्रदेश कमिटीकडे पाठविले जाईल.तरी बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 2 ते 31 ऑक्टोबर 2020 या दरम्यान सह्यांची मोहीम राबविण्यासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे याची नोंद घ्यावी.
-राजकिशोर मोदी (अध्यक्ष,बीड जिल्हा काँग्रेस कमेटी.)