अंबाजोगाईतील बेमुदत ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
अंबाजोगाई (प्रतिनिधी): औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत आले होते.आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली.या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.मात्र आंदोलक अजूनही पोलीस उपअधीक्षक जायभाये यांच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम आहेत.जो पर्यंत निलंबन होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.माधव जाधव यांनी जाहीर केली आहे.
गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना,जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा शुक्रवारी सायंकाळी अंबाजोगाईत आले होते.त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली.मात्र,आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने आता मागील चार दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन पुढेही सुरूच राहणार आहे.अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनाचे लोण पसरले आहे.लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर या आंदोलनाचा भडका उडेल अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड.माधव जाधव यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण :-
विनयभंग आणि ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले डॉ.सुहास यादव हे फरार आहेत.डॉ.यादव यांचा शोध घेताना चौकशी करण्यासाठी म्हणून स्वतः डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी (०६ जुलै) रात्री त्यांचे चुलत भाऊ विलास यादव यांना प्रशांतनगर भागात गाठले.तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत जातीवरून शिवीगाळ करत मारहाण केली,कुटुंबाबाबतही आक्षेपार्ह्य भाषा वापरली असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.त्यानंतर यादव यांना पोलीस ठाण्यात नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली.मराठा क्रांती मोर्चाचा काही कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर यादव यांची सुटका करण्यात आली.या घटनेचे पडसाद बुधवार पासून उमटण्यास सुरूवात झाली.विलास यादव यांना चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण व जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे डीवायएसपी जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.ते सलग चौथ्या दिवशी म्हणजे शनिवारीही सुरूच होते.
*चार तास मॅरेथाॅन चौकशी :-*
आयजी प्रसन्ना यांनी अंबाजोगाईत येत अपर पोलीस अधिक्षक कार्यालयात तब्बल चार तास ठाण मांडून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले.या प्रकरणातील मूळ फिर्यादी महिला,डीवायएसपी जायभाये,कार्यालयातील अन्य अधिकारी,कर्मचारी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आलेले ॲड.माधव जाधव,ॲड.संतोष लोमटे आणि ॲड.अजित लोमटे यांची बाजू त्यांनी समजून घेतली.संपूर्ण चौकशी करून सोमवार पर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.
*यांनी दिला आंदोलनास पाठींबा*
शुक्रवारी सुरू असलेल्या या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबाजोगाई साखर कारखान्याचे अध्यक्ष रमेशराव आडसकर,केज येथील व्यापारी महासंघाचे महादेव सूर्यवंशी,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,सुरज पटाईत, भाजपाचे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे, पं.उद्धवराव आपेगावकर,प्रा.नानासाहेब गाठाळ,अशोकराव देशमुख,शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट,शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर तर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड,जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे,माजी आ.राजेंद्र जगताप,माजी आ.पृथ्विराज साठे,प्रा.टि.पी.मुंडे,शिवाजी ठोंबरे,विजय दराडे (माजलगाव),धम्मपाल कांबळे,पञकार दत्तात्रय अंबेकर,पञकार गोविंदराव शिनगारे (केज), दगडू लोमटे,प्रा.भगवान शिंदे,सोलापूर येथील मराठा क्रांती मोर्चाचे हर्षल बागल,संभाजी घाडगे (बार्शी),शोभा घुटे,श्रीरंग चौधरी यांच्यासह विविध पक्ष व संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.छावा संघटनेने पाठिंबा दिला.शुक्रवारी तळेगाव घाट,हातोला आणि बर्दापुर येथील तर शनिवारी पिंपळा धायगुडा,जवळगाव,मगरवाडी,पुस,गिरवली,वरवटी येथील मराठा समाज बांधव,कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.रविवारी वाघाळा,मुडेगाव,राडी,वाघाळवाडी,दैठणा या गावचे मराठा समाज बांधव,कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
चौकशी अहवालानंतर कारवाई :-
संबधित अधिकाऱ्याला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी समज दिली आहे. लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येईल आणि त्याआधारे कारवाई केली जाईल असे अपर अधीक्षक स्वाती भोर यांनी सांगितले.
आ.सुरेश धस यांचे पोलीस अधीक्षक यांना पञ :
अंबाजोगाईतील ठिय्या आंदोलन प्रकरणात पोलीस विभाग हा कार्यपद्धतीला तिलांजली देवून काम करीत आहे.अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक हे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करीत आहेत.या अन्यायाविरूद्ध मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहका-यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच ही चौकशी होईपर्यंत त्यांची इतरत्र बदली करण्यात यावी असे आ.धस यांनी लिहीलेल्या पञात नमूद केले आहे.
राडी येथे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन :-
अंबाजोगाई येथील पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या सहका-यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोलीस प्रशासनातील वाईट प्रवृत्तीचा निषेध करीत राडी येथे मराठा समाज बांधवांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.