आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ४ : शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी वार्षिक कृती आराखडा विकसित केला असून येत्या शैक्षणिक वर्षात अधिकाऱ्यांनी त्याची प्रभावी अंमजबजावणी करावी, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
आज मंत्रालयात शालेय शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री अमरीश पटेल, निरंजन डावखरे, ज. मो. अभ्यंकर, जयंत आसगावकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, सुधाकर अडबोले, माजी आमदार कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (दूरदृश्य प्रणाली द्वारे), एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी, शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील प्रत्येक मुलाला चांगले आणि दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये पायाभूत व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार असून त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिका व शिक्षण विभागाची एकत्रित बैठक घेण्यात येईल. पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री शाळा योजना राबविण्यात येणार असून सीएमश्री अंतर्गत पाच हजार शाळा आदर्श शाळा करण्यात येणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी विभागातील अधिकारीही उपस्थित असणार आहेत. या शैक्षणिक वर्षात शाळेतील पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याने आईच्या नावे एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी केले.
शासकीय शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती रुजविण्यावर भर दिला जात असून शाळांमध्ये डिजिटल साधनांची उपलब्धता वाढवण्यात येत आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभाग सकारात्मकरित्या काम करीत असून शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी संच मान्यतेसंबंधीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने अतिरिक्त शिक्षकांची सेवाजेष्ठतेनुसार यादी तयार करणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आदी बाबींवर मान्यवरांनी मते मांडली.
या बैठकीत वस्ती शाळांवरील स्वयंसेवक शिक्षकांचे प्रश्न, टप्पा वाढ, अतिरिक्त शिक्षक समायोजन, शिक्षकांचे प्रशिक्षण, वेतनतर अनुदान, जुनी पेन्शन योजना या विषयाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
00000
शैलजा पाटील/विसंअ