आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘खरीप हंगामात पेरणीची तयारी व पिकांचे नियोजन’ या विषयावर परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन उपसंचालक तसेच जमिनीचे आरोग्य आणि पिकांचे पोषण तज्ज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ६, शनिवार दि. ७, सोमवार दि. ९ आणि मंगळवार दि. १०, जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याअनुषंगाने शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणीची तयारी व पिकांचे नियोजन करतांना अनुकूल हवामान आणि पावसाचा अंदाज घेवून तयारी करणे आवश्यक असणार आहे. पिकांच्या संतुलित पोषणासाठी जमिनीचे आरोग्य हा महत्त्वाचा घटक आहे. ही बाब विचारात घेवून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी खते, बियाणे आणि किटकनाशके वेळेवर व योग्य प्रमाणात आणि दर्जेदार उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने योग्य नियोजन केले आहे. त्याअनुषगांने खरीप हंगामाची तयारी करतांना शेतकऱ्यांनी आपल्या पीकाचे नियोजन, उत्पादन वाढीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर, पेरणीपूर्वी माती परिक्षण कसे करावे, या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून संशोधन उपसंचालक डॉ. कौसडीकर यांनी माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/विसंअ/