आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले.
यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारी, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाचा असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा – हेमराज बागुल
आपत्कालीन परिस्थितीत समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले, आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. बागुल म्हणाले.
अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे
आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिक, राज्य व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात. या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेऊन ती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी.
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणे, आणि आवश्यक सूचना पोहोचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावा, ज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावी, विशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले.
यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या.
००००