आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत नरहरी विष्णूशास्री तथा दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, आजन्म ग्रंथोपासक, सडेतोड मिमांसक अशा या व्रतस्थ विचारवंताचे निधन ही मोठी हानी आहे. त्यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून व्यासंगाची परंपरा होती. ती त्यांनी वेदाभ्यास, सरस्वतीस्वरुप ग्रंथाचा अभ्यास यातून समर्थपणे पेलली. एकनाथी भागवत, भावार्थ रामायण ग्रंथाच्या प्रकाशानात त्यांचे मोठे योगदान राहिले. महाभारतावरील त्यांचे भाष्य गाजले. वैविध्यपूर्ण व्याख्याने, विविध लेखमाला आणि विविध विषयांवरील विपुल लेखन संपदा अशी त्यांचा व्यासंग होता. त्यांच्या निधनामुळे चौफेर व्यासंग जोपासणाऱ्या परंपरेचा व्रतस्थ असा दुवा निखळला आहे. त्यांच्या निधनामुळे शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
000