कोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजलातूर जिल्हा

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची नवीन केस होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी―पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि.२७:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात आज रोजी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 इतकी असून हे सर्व रुग्ण मुंबई-पुणे व बाहेरून प्रवास करून आलेले आहेत. लातूर जिल्ह्यात प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना प्रभावीपणे राबवल्या असून रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवलेली आहे. तरी पुढील काळात कोरोनाबाधित रुग्णाची नवीन केस होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
झूम मिटींग ॲप द्वारे पालकमंत्री अमित देशमुख यांनी covid-19 च्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस झूमवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, लातूर महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदि उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोना चा प्रसार आटोक्यात आणलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा प्रशासनाच्या सर्व टीमचे अभिनंदन आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेले 53 रुग्णांपैकी 95 टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व इतर रुग्णावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करून घरी सोडले जाईल. आपल्या जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97 ते 98 टक्के इतके आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात एकही कोरोना पॉझिटिव्ह केस होणार नाही याबाबत प्रशासनाने अधिक जागरूक राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र व राज्य शासनाने एखाद्या भागात कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील किती भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करावयाचा याबाबत प्रोटोकॉल प्रमाणे प्रशासनाने काम करावे व त्या झोन’मध्ये अत्यावश्यक सर्व सुविधा वेळेवर उपलब्ध होतील याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. जर कँटमेंट झोनची मर्यादा नसेल तर एखाद्या भागात एखादा रुग्ण आढळल्यास त्या भागात आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात परंतु तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करू नये अशी सूचना त्यांनी केली.
लॉक डाऊन मध्ये गंजगोलाई परिसरात वाहन पार्किंग बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेले मनाई आदेश योग्य असून पुढील काळात यामध्ये सुलभता आणावी परंतु शिथिलता देऊ नये अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी करून वाहनधारकांसाठी वाहन पार्किंगची व्यवस्था करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पार्किंग बाबत चांगले पाऊल उचलले असून पुढील काळात महापालिका प्रशासनाने शासकीय जागेत पार्किंग स्लॉट तयार करण्याचे काम पूर्ण करावे, असेही त्यांनी सूचित केले.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या परिसरातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल हे पूर्णपणे सज्ज असून या हॉस्पिटलचा लवकरच शुभारंभ करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. तसेच जिल्ह्यातील शिव भोजन केंद्रामध्ये फिजिकल डिस्टनचे पालन होत आहे की नाही त्याबाबत प्रशासनाने खात्री करावी. कंटेंमेंट झोन मधील नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोळ्या प्रोटोकॉल प्रमाणे देता येत असतील तर द्याव्यात असेही त्यांनी सूचित केले.
टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवण्याबाबत ची मागणी केल्यास त्याची प्रशासनाने तात्काळ पडताळणी करून त्या उपयोजना राबविण्यास मंजुरी देण्याचे निर्देश प्रशासनाला यापूर्वीच दिलेले होते, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आवश्यक असलेल्या ॲम्बुलन्स चा पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून खाजगी डॉक्टरांकडे ही पीपीई किट व इतर साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहेत, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच फळ व भाजीपाला मार्केट च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अमरावती पॅटर्न ची माहिती घेऊन तो आपल्या लातूर शहरात राबवणे शक्य आहे का याची पडताळणी करावी असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही कोरोना व पाणीटंचाईच्या अनुषंगाने समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली.
प्रारंभी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती दिली. सध्या जिल्ह्यात जे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत ते मुंबई पुणे व इतर भागातून आलेले व पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील असल्याचे त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात औसा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेले कोरोना बाधित रुग्ण 53 असून 22 कंटेनमेंट झोन आहेत. या सर्व कंटेंटमेंट झोनमध्ये मध्ये शासन सूचनेनुसार व्हाट्सअप ग्रुप बनवलेले असून या ग्रुप मध्ये एका महिला अधिकाऱ्यांचाही समावेश केल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा प्रशासन पुढील काळात कोरोनाशी लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे व अधिष्ठता डॉ. ठाकूर यांनीही त्यांच्या स्तरावरून होत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या च्या कामाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button