सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात दोन दिवसात तब्बल दोन शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याच्या घटना रविवारी उघडकीस आल्या असून यामुळे सोयगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पळाशीतांडा,आणि पहुरी या दोन गावांमध्ये दोघा अल्पभूधारक तरुण शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या असून पळाशीतांडा येथील चाळीस वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले असून पहुरी ता.सोयगाव येथील २४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याला कंटाळून घरातच गळफास घेतल्याचे रविवारी उघड झाले आहे.
रघुनाथ मखराम चव्हाण(वय ४० पळाशीतांडा)आणि सुदाम शांताराम मगर(वय २४ पहुरी)असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून पळाशीतांडा येथील शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी पाचोरा जि.जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पाचोरा जि.जळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतुयची नोंद करण्यात आली आहे.पहुरी ता.सोयगाव येथील शेतकऱ्याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली असून या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सुदाम मगर या तरुण शेतकऱ्यांच्या नावावर वाकडी ता.सोयगाव येथील शिवारात गट क्र ६४ मध्ये २ एकर शेती आहे.परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी हा शेतकरी सक्षम नसल्याने त्याने घरातच गळफास घेवून जीवन संपविले आहे.या प्रकरणी सोयगाव महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
या दोघांकडे खासगी आणि बँका असे मिळून पाच लाखाच्यावर कर्ज होते त्या कर्जाच्या फेड करण्याच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्या आहे.पळाशीतांड्यातील शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.तर पहुरीच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी असा परिवार आहे.