लातूर (प्रतिनिधी): किसानपुत्र आंदोलनाच्या आंबाजोगाई शिबिरात (२०-२१ ऑक्टोबर १८) यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत किसानपुत्रांनी काय भूमिका घ्यावी या बाबत भूमिका ठरवण्यात आली. त्यात स्पष्ट केले आहे की, शेतकरीविरोधी कायदे करणारा काँग्रेस (युपीए) आणि त्याची मिटक्या मारीत अंमलबजावणी करणाऱ्या भाजप(एनडीए)ला किसानपुत्र मतदान करणार नाहीत. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याचे स्पष्ट आश्वासन असलेल्या स्वतंत्र भारत पक्ष व स्वर्ण भारत पक्षांच्या उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा बिनशर्त पाठिंबा राहील.
लातूर लोकसभा मतदार संघात स्वतंत्र भारत पक्षाने रुपेश शंके यांना उमेदवारी दिली आहे. किसानपुत्र आंदोलनाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे.
रुपेश शंके हे तरुण आहेत. शेतकरी आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते स्वतंत्रतावादी विचारांचे पाईक आहेत. शेतकरीविरोधी कायदे रद्द झाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली आहे इतकेच नव्हे तर १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्यांचे स्मरण करून शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प करण्यासाठी झालेल्या अन्नत्याग आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग दिला. या पार्श्वभूमीवर त्यांना मतदान करणे हे प्रत्येक किसानपुत्राचे कर्तव्य आहे.
लातूर मतदार संघात असंख्य किसानपुत्र आहेत. समाजवादी व्यवस्थेने त्यांना संकटात ढकलले आहे. त्यांना जगण्याची नवी वाट सापडली असली तरी त्यांना अनेक समस्यांनी घेरलेही आहे. सरकारी कारणांचा तडाखा त्यांनाही बसतो आहे. त्याच बरोबर त्यांची शेतकऱ्यांशी असलेली नाळ अजून तुटलेली नाही.
या समूहाला एका नव्या व्यवस्थेची गरज आहे. ती गरज भाजप किंवा काँग्रेस भागवू शकत नाही कारण ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अन्य राजकीय पक्षही त्याच धाटनीने वाटचाल करतात म्हणून खरी गरज नवा पर्याय देण्याची आहे. स्वतंत्र भारत पक्षाने लातूर जिल्ह्यात पर्याय दिला आहे. किसान पुत्र व पुत्रीनी या संधीचे सोने करावे व रुपेश शंके यांना मत द्यावे, असे किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी आवाहन केले आहे.