पाटोदा, (प्रतिनिधी): शनिवार, ७ जून २०२५ – पाटोदा ते शंभर चिरा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत बोगस झाले असून, यामुळे परिसरातील वाहनधारकांचे आणि ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार, पाटोदा यांना निवेदन दिले असून, या प्रकरणाची अद्याप कोणतीही चौकशी झाली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा ते शंबर चिरा हा रस्ता ग्रामीण रुग्णालयाच्या जवळून जातो. अत्यंत महत्त्वाचा असूनही, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, बीड यांच्या नियंत्रणाखाली झालेले हे काम निव्वळ बोगस असल्याचे दिसून येते. या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. हा रस्ता अंदाजे पाच किलोमीटरचा असून, यापूर्वी दोन ते तीन वेळा बजेट उचलूनही प्रशासनाने कामाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेचा मुख्य हेतूच बाजूला पडल्याचे चित्र आहे. खेडेगावांना जोडणाऱ्या या मार्गाची दुर्दशा झाल्याने दळणवळणाची साधनेही निरुपयोगी ठरत आहेत.
चौकशी नाही, आंदोलन अटळ
वंचित बहुजन आघाडीचे सचिन मेगंबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या संबंधित यंत्रणेचे अधिकारी व गुन्हेगार यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, यावर गुरुवारपर्यंत (५ जून २०२५) कोणतीही कारवाई झालेली नाही.” प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे आणि कारवाईच्या अभावामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीने पाटोदा तहसील कार्यालयासमोर १२ जून २०२५ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.
या बोगस रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.