प्रशासकीयब्रेकिंग न्युज

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी शासन आग्रही असून तेवढीच कार्यतत्परता संबंधित यंत्रणांनी दाखवून कोणत्याही प्रकारची अडकाठीची भुमिका यात ठेवता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज प्राधिकरणाच्या सभागृहात श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संदीप जोशी, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना, सहायक आयुक्त सचिन ढोले यांच्यासह एनएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, घरकूल बांधकाम (प्रधानमंत्री आवास योजना), अमृत योजनेअंतर्गत पाणी व सिवेजलाईन, गुंठेवारी नागपुर महानगर पालिका क्षेत्र प्रकरणे, हुडकेश्वर नरसाळा येथील मुलभूत विकास कामे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नाले खोलीकरण या विषयावर आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेबाबत पात्र लाभार्थ्यांना, ग्रामीण भागातील सरपंचांना परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. यादृष्टीने नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व सरपंचाची कार्यशाळा लवकर आयोजित करण्यात यावी. यात या योजनेची माहिती देत जनजागृती करुन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यात यावे, असे मंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले. खरबी व तरोडी येथील पट्टेधारकांना पट्टेवाटप, गुंठेवारीची काम गतीने करणे तसेच पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

नागरिकांपर्यंत पोहोचा, संवाद साधा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नगरपंचायत व नगरपरिषद मुख्याधिका-यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यासाठी कार्यालयीन दिवशी दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत आपल्या कार्यक्षेत्रात फिरून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या मार्गी लावाव्यात  तसेच आठवड्यातून एक दिवस कार्यक्षेत्रातील नागरिकांशी जनसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज नगरपालिका व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या समवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. श्यामकुमार बर्वे, आ. कृष्णा खोपडे, आ. परिणय फुके, आ. चरणसिंग ठाकूर, आ. संजय मेश्राम, माजी आ. सुधाकरराव कोहळे, माजी आ. सुधीर पारवे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक नगरपरिषद व नगरपालिका क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज या बाबींवर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करून त्या मार्गी लावण्यात याव्यात, अग्निशमन यंत्रणा सुस्थिती आहे का याची तपासणी, सांडपाणी, पूरपरिस्थितीचे नियोजन, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (घरकुल) नोंदणीची युद्धस्थळावर अंमलबजावणी, नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावणे आदींची कार्यवाही करण्याचे निर्देश व आठवडाभरात नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्राचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button