लिंबागणेश: (दि. १४) शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह, शेतीमालाला हमीभाव, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे राष्ट्रसंतांच्या महासमाधीजवळ, गुरुकुंज मोझरी येथे गेल्या सात दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे आजच्या शेती क्षेत्राचे कटू सत्य असून, शेतीमालाला भाव मिळत नसल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत.

सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नसल्याने, आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हताश होऊन टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवत आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीत, मा. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ आज, शनिवार, १४ जून रोजी सकाळी लिंबागणेशकरांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोरदार निदर्शने केली. यावेळी “शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे,” “शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे,” आणि “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” अशा घोषणा देत उपस्थितांनी आपला पाठिंबा दर्शवला.
शेतकरी कर्जमाफीसह इतर प्रमुख मागण्या मान्य करून, बच्चू कडू यांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी आणि परिस्थिती चिघळण्यापूर्वीच हे बेमुदत आमरण उपोषण सोडवण्यात यावे, अशी मागणी करत लिंबागणेशकरांनी ईमेलद्वारे बच्चू कडू यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, या संदर्भात जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
या आंदोलनात राजेभाऊ गिरे, भीम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ऑल इंडिया पँथर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनावणे, विक्रांत वाणी, रामकिसन गिरे, संतोष भोसले, सय्यद अख्तर, सुरेश निर्मळ, आरुण निर्मळ, राहुल जाधव, तुकाराम गायकवाड, रामदास मुळे, अर्जुन गोंडे, आश्रुबा गिरे, भगवान मोरे, रामकिसन गिरे, लहू घोलप, दत्ता घरत, तुषार गायकवाड, शहाजी वाणी, भालचंद्र गिरे, लहू घोलप आदींसह अनेक लिंबागणेशकर सहभागी झाले होते.