बीड: बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या मंजुरीचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जा आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची नैतिक जबाबदारी घ्यावी, अशी तीव्र मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. गेल्या वर्षी (२०२४) ४५९ आणि या वर्षी (२०२५) ५ महिन्यांत १५७ असे एकूण ६१६ अपघाती बळी गेले असताना, श्रेयवादाची लढाई लढणाऱ्या नेत्यांच्या चुप्पीवर डॉ. ढवळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार, २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात बीड जिल्ह्यासाठी ४२१ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. यामध्ये लातूर ते लोखंडी सावरगाव दरम्यान बार्दापूर फाटा ते लोखंडी सावरगाव (१८ किमी) रस्त्याचे चौपदरीकरण आणि माजलगाव ते केज दरम्यान धारूरजवळील ‘ब्लॅक स्पॉट’ ठरलेल्या घाटाचे काम या दोन टप्प्यांचा समावेश आहे. या कामांचे श्रेय घेण्यासाठी माजी खासदार प्रीतमताई मुंडे आणि विद्यमान खासदार बजरंग बप्पा सोनावणे यांच्यात सध्या पत्रकबाजी सुरू आहे.

डॉ. ढवळे यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, निकृष्ट रस्ते, गुळगुळीत रस्त्यांवरील गतिरोधकांचा अभाव, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत केवळ फोटोसेशन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात ४५९ जणांनी अपघातात जीव गमावला, तर ३९७ जण गंभीर जखमी झाले. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या ५ महिन्यांत २५९ अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला असून, १०२ जण गंभीर जखमी झाले आहेत. शासनाच्या नोंदीनुसार, जिल्ह्यातील महामार्गावर तब्बल ४० ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत, जिथे वारंवार अपघात होतात.
जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ची यादी
जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केलेली ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत: सिरसाळा, नितरुड, नंदगाव डेअरी, सायगाव (ता. आंबेजोगाई), धारूर घाट, होळेश्वर विद्यालय, एचपी पेट्रोलपंप ते चंदनसावरगाव, सुडी पार्टी ते मांगवडगाव, लोखंडी सावरगाव, धामणगाव, वाघळूज, साबलखेड, पांढरी, पोखरी, चुंबळी फाटा, बामदळवाडी, मांजरसुंबा घाट, मंझेरी रोड, पाली, छत्रपती संभाजी महाराज चौक, पाडाशिंगी ब्रिज, रांजणी, गढी पूल, वडगाव ढोक, नायरा पंप गेवराई, बागपिंपळगाव, नागझरी सिरसदेवी शिवार, मादळमोही पेट्रोलपंप, सावरगाव आणि पांगर बावडी.
निकृष्ट रस्त्यांमुळे अपघातांची मालिका
डॉ. ढवळे यांनी नमूद केले की, रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण न होणे, निकृष्ट दर्जाची कामे (उदा. उद्घाटनापूर्वीच रस्त्यांना तडे जाणे, भेगा पडणे), अपघातप्रवण स्थळी गतिरोधकांचा अभाव, अनेक ठिकाणी वळणावर सूचना व दिशादर्शक फलकांचा अभाव आणि सिग्नल यंत्रणा नसणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर वारंवार आवाज उठवला असताना, लोकप्रतिनिधी मात्र ‘मूग गिळून गप्प’ होते. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर त्यांना श्रेयवादाची आठवण झाल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे. अपघातांचे हे बळी आणि जखमींची जबाबदारी घेण्याची नैतिक हिंमत या लोकप्रतिनिधींनी दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.