लिंबागणेश: यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी वाफसा होताच कापूस लागवडीसह तूर, मका, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांची पेरणी मोठ्या उत्साहात केली. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने वाढणारे तापमान आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. या कोरड्या हवामानामुळे पिकांचे कोवळे अंकुर उन्हाच्या तीव्र झळांनी करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी पिके कोमेजून जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान अटळ असून, यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. या अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्यांसाठी असह्य ठरणार आहे.

यातच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे जोमात आलेल्या कोबीसारख्या पालेभाज्यांवर करपा, मावा, अळी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कोबीच्या पानांना छिद्रे पडणे, काळे डाग येणे अशा बुरशीजन्य रोगांची लागण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत, असे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.
कोबी उत्पादक शेतकरी गणपत तागड यांची व्यथा: लिंबागणेश येथील कोबी उत्पादक शेतकरी गणपत तागड यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, त्यांनी दोन एकर शेतीत उंदडवडगाव येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव यांच्या नर्सरीतून ६० हजार कोबी रोपांची लागवड केली. खते, औषध फवारणी यासह एकूण १ लाख रुपयांचा खर्च आला आहे. कोबीचे पीक सध्या जोमात आले असून, त्यांना अंदाजे ६-७ लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु, गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेले ढगाळ वातावरण आणि पावसाची संततधार यामुळे कोबी पिकांवर करपा, मावा, किडींमुळे पानांना छिद्रे पडणे, काळे डाग असे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पदरात किती पडेल, याबाबत त्यांना शंका वाटत आहे.
‘शेतकऱ्यांना निसर्गाने मारले, सरकारने वाऱ्यावर सोडले’ – डॉ. गणेश ढवळे
बीड जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ८ लाख ८ हजार ९४६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या प्रस्तावित केल्या आहेत. १६ जूनपर्यंत यापैकी ३ लाख ८९ हजार ४४८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, आता जवळपास चार लाख हेक्टरपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८.१४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरण्या होताच १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे ढग दिसू लागले आहेत. यामुळे पेरणी झालेल्या आणि पेरणी न झालेल्या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना, सरकारचे मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर यांनी दिली.