अंबड:आठवडा विशेष टीम― जालना जिल्हयामध्ये गेल्या पंधारा ते वीस दिवसापासून सतत मुसळधार पडणारा आवकाळी पाऊस व वादळ वारा यामुळे खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे.आज रोजी अंबड तालुक्यातील सा.पिंपळगाव,बळेगाव आपेगाव व डोमलगाव येथे अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या कापूस,बाजरी, सोयाबीन,तुर, मुग,उडीद,केळी,पपई व मोसंबी पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची माजी मंत्री आ.राजेश टोपे यांनी पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या बरोबर अंबड तालुक्याच्या तहसीलदार सौ.मनिषा मेने व तालुका कृषी आधिकारी श्री.वैद्य हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ.राजेश टोपे म्हणाले की,झालेल्या नुकसानीमध्ये मोसंबी,डाळींब, पपई व केळी या फळबागांचाही समावेश करावा तसेच मोसंबीचा अंबे बहार व मृग बहार या दोन्हींचाही विमा भरुन घेण्यात यावा याबाबत शेतकऱ्यांना कोणतेही बंधन घालु नये. संपूर्ण शेतामध्ये पाणी साचल्याने संपूर्ण पिक वाया गेले आहे.त्यामुळे सरसकट पंचनामे करुन तात्काळ 100%नुकसान गृहीत धरुन नुकसान भरपाई देण्यात यावी. कागदपत्राची ससेमिरा लावू नये,विमा व नुकसान भरपाई दोन्ही शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशी मागणी आ.राजेश टोपे यांनी केली आहे.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष मा.सतिष टोपे,प्रा.भागवतराव कटारे, ख.वि.सं.चेअरमन मा.भाऊसाहेब कनके,पं.स.उपसभापती बाळासाहेब नरवडे,संजय कनके आदींसह गावातील शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होता.