दोन तासाच्या आंदोलनात अधिकारी आलेच नाही
सोयगाव (ज्ञानेश्वर धोंडू पाटील): शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी लागणारी शिवाजी चौकातील जागा व कायदेशीर बाबी पूर्ण करुनही मिळत नसलेली परवानगी यासाठी चक्क दोन तरुणांनी बी.एस.एन.एल चा मनोरा गाठून या मनोऱ्यावर चढून दोन तास अनोखे आंदोलन केले,परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत आंदोलन असल्याचे कारण पुढे करत आंदोलनस्थळी आश्वासानासाठी भेटी न दिल्याने गोंधळ उडाला होता,अखेरीस नागरिकांनी या दोघांना एकजूटीतून संघर्ष करण्याचे आश्वासन दिल्याने या दोघांची मनपरिवर्तीत करण्यास शहरवासीयांनाच मध्यस्थी करावी लागल्याने दोन तासांच्या कालावधीनंतर या दोघांनी मनोऱ्यावरून उतरत आंदोलन माघारी घेतले.
शहरातील शिवाजी चौकात तालुका नियोजन समितीच्या वतीने अनेकवेळा शिवाजी चौकातील जागेवर निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी नियोजन समितीच्या वतीने प्रशासनाकडे कायदेशीर बाबी दूर करून कागदपत्रे सादर करूनही या जागेवरील अडथळे दूर न झाल्याने अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला असल्याने नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील चौधरी,गटनेता भागवत गायकवाड,या दोघांनी बी.एस.एन.एल च्या मनोऱ्यावर चढून दोन तास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले,दरम्यान आंदोलन स्थळी प्रशासनाचा कोणताही अधिकारी आश्वासनासाठी आंदोलन स्थळी न फिरकल्याने मोठा गोंधळ उडाला होता.जागेवरील अडथळे तातडीने दूर करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन माघारी घेण्याचे या आंदोलकांनी ठरविले असल्याने आंदोलक काही करता मनोऱ्यावरून खाली उतरण्यासाठी तयार होत नसल्याने अखेरीस मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,अॅड.योगेश जावळे,भाजपा शहरध्यक्ष सुनील ठोंबरे,संदीप सोनावणे,भैय्या जुनघरे,सुनील काळे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे,रऊफ देशमुख,आदींनी आंदोलक कर्त्यांना एकजूटीतून संघर्ष करून अडथळे दूर करण्यासाठी आश्वासन दिल्याने शहरवासीयांच्या एकजुटीच्या आश्वासनातून या आंदोलनाची माघारी झाली. सोयगाव पोलिसांनी आंदोलन स्थळी दोघांना परिवर्तीत करून खाली उतरविण्याचा प्रयत्न केला.
सोयगावच्या बी.एस.एन.एल च्या मनोऱ्यावर चढलेले आंदोलक आणि या छायाचित्रात जमलेली बघ्यांची गर्दी
काय आहे अडथळे
नियोजन समितीने तीन महिन्यापासून शिवाजी चौकातील जागेवरील अडथळे दूर करण्यासंबंधी वारंवार सार्वजनिक विभागाशी पत्र व्यवहार केला,नगर पंचायतीने शिवाजी चौकातील जागा हस्तांतरित करण्याबाबत सार्वजनिक विभागाला पत्र देवूनही या विभागाकडून अद्यापही कारवाई होत नाही.शिवाजी चौकातील अडथळ्यांची शर्यत अद्यापही संपत नसल्याने अखेरीस नियोजन समितीच्या संतप्त दोघांनी मनोऱ्यावर चढण्याचे आंदोलन केले परंतु अद्यापही ठोस आश्वसन न मिळाल्याने प्रश्न प्रलंबितच राहण्याची शक्यता असल्याने या पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुनील चौधरी यांनी दिला आहे.