मुंबई दि.२३:आठवडा विशेष टीम― भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र्र राज्यात विशेषतः मुंबईत वाढत आहे. मुंबईत वेगवान रुग्णसंख्या वाढत असताना महाविकास आघाडी चे राज्य सरकार केवळ आकडेवारी ची कोरडी घोषणा करून जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे. वास्तविक कोरोनाबधित रुग्णांना सरकरी आणि खाजगी कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार च्या ढिसाळ कारभारामुळे अपयशी ठरले असल्याची तीव्र नाराजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची मुंबईत वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्या तुलनेत रुग्णालयांमध्ये कोरोना बधितांना उपचार मिळत नाहीत. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत कोरोना बाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.औषधोपचार योग्य मिळत नाही. मात्र त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जे केवळ वृत्तमध्यमांसमोर मोठया घोषणा करून जनतेच्या डोळ्यांत आश्वासनांची धूळफेक करीत आहेत.अशी टीका ना रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थिक ; सामाजिक आणि आरोग्य आशा सर्व स्तरांवर नियोजनबद्ध प्रयत्न केले आहेत. 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियान साठी महापॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्र्र राज्य सरकारने राज्यातील गरीबांसाठी कोणतेही पॅकेज जाहीर केले नाही. राज्य सरकारकडे असलेल्या निधीतून महाविकास आघाडी सरकारने गरिबांसाठी पॅकेज जाहीर करायला पाहिजे होते. तसेच राज्यातील परप्रांतीय मजूर लॉक डाऊन च्या काळात पायी चालत त्यांच्या गावी गेला. त्या मजुरांसाठी राज्य सरकारने कोणतीही सुविधा दिली नाही.जर राज्य सरकार ने या मजुरांसाठी अन्नपाणी राहण्याची व्यवस्था केली असती तर परप्रांतीय
मजुरवर्ग राहिला असता. राज्यात उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी मजूर कामगारांची गरज आहे. लाखो मजूर आपल्या गावी गेले असून कोरोनामुळे ते पुन्हा राज्यात परत येण्याची शक्यता नाही.
केंद्र सरकार ने गरिबांना प्रत्येकी 5 किलो तांदूळ दिला त्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने राज्यात गरिबांना डाळ साखर आदी जीवनोपयोगी वस्तू द्यायला पाहिजे होत्या असे सांगत कोरोनामुळे लागू केलेल्या लॉक डाऊनला आता दोन महिने होत आले मात्र या कालावधीत महाविकास आघाडी सरकार हे नाकर्ते सरकार ठरले असल्याची टीका ना.रामदास आठवले यांनी केली आहे.