परळी दि.१० (आठवडा विशेष): परळी येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब गणपतराव वाघमारे यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे यांच्या साहित्य लिखाणातून समाजाला समतेची शिकवण मिळते. समाजातील वंचित घटकांविषयी सहानुभूती, ममत्व आणि ताकद या तीनही बाबी त्यात आहेत. शिक्षक हे अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचे दीप लावण्याचे काम करत असतात, अगदी त्याच प्रमाणे वाघमारे गुरुजींचे काम आहे, त्यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आजच्या पिढीला आहे. अशा शब्दांत आबासाहेब वाघमारे यांच्या साहित्याचा गौरव केला.
वाघमारे गुरुजींचे लिखाण हे अमृता सारखे असून गुरुजींच्या लिखाणातून समतेची शिकवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होते. प्रेरणा देणा-या साहित्याचे वाचन आजच्या पिढीने केले पाहिजे. कोणत्याही प्रश्नांचे उत्तर वाघमारे यांच्या साहित्यातून मिळते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. फ.म. शहाजिंदे व प्रमुख पाहुणे इंद्रजित भालेराव हे उपस्थित होते.. शहरातील साहित्य प्रेमी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.