गोकुळधाम मलकापूर येथे धम्मग्रंथ वाचनाने वर्षावास पर्वाला उत्साहात प्रारंभ

मलकापूर, १२ जुलै (विशेष प्रतिनिधी): बौद्ध धम्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तीन महिन्यांच्या वर्षावास पर्वाला आषाढी पौर्णिमेच्या मंगल दिनी मलकापूर येथील गोकुळधाम परिसरात उत्साहात सुरुवात झाली. संबोधी बहुउद्देशीय संस्था, गोकुळधाम वाकोडी द्वारा संचालित संबोधी बुद्ध विहारात या पवित्र पर्वाचा शुभारंभ करण्यात आला. ‘समतेचे निळे वादळ’ या महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय भाई अशांतजी वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

वर्षावासाच्या या पवित्र कालावधीची सुरुवात, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथाच्या वाचनाने झाली. ज्येष्ठ उपासक श्री. जी. डी. झनके सर यांनी ग्रंथ वाचनाचा शुभारंभ केला. विशेष म्हणजे, संबोधी बुद्ध विहारात गेल्या पाच वर्षांपासून सालाबादप्रमाणे वर्षावासाच्या काळात हा ग्रंथ वाचनाचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. हा कार्यक्रम संबोधी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित केला जातो आणि यामागे धम्म संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उदात्त हेतू आहे.

आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून, कार्यक्रमाचे आयोजक श्री. संदीप वानखडे सर यांनी उपस्थितांसाठी खिरदान वाटप केले. धम्मामध्ये दानाला विशेष महत्त्व असल्याने या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी, संस्थेच्या वतीने आदरणीय भाई अशांतजी वानखडे यांचा त्यांच्या सामाजिक आणि धम्म कार्याबद्दल सत्कार करून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ धम्म उपासक आणि महिला मंडळाच्या धम्म उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये प्रामुख्याने श्री. जी. डी. झनके सर, डॉ. एस. वाय. ढाले, श्री. पी. जी. इंगळे सर, श्री. डी. एस. हेलोडे साहेब, श्री. एस. के. वले सर, श्री. एन. एम. इंगळे सर, श्री. एन. एन. मनवर साहेब, श्री. एम. डी. इंगळे सर, श्री. एन. डी. इंगळे सर, श्री. आर. के. उमाळे सर, डॉ. पी. आर. भोगे सर, श्री. अनंता तायडे सर आणि रोकडे साहेब यांचा समावेश होता.

त्याचबरोबर महिला उपासिकांमध्ये श्रीमती अलकाताई झनके, श्रीमती संगीताताई ढाले, श्रीमती अलकाताई हेलोडे, श्रीमती उषाताई इंगळे, श्रीमती पुष्पाताई बिऱ्हाडे, श्रीमती वंदनाताई झनके, श्रीमती शोभाताई भोंगे, श्रीमती मालाताई उमाळे, श्रीमती कविताताई वले, श्रीमती संगीताई जाधव, श्रीमती वैशालीताई वानखडे आणि कुमारी अधिरा झनके यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन आणि सूत्रसंचालन श्री. संदीप वानखडे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. शरद झनके यांनी मानले. पुढील तीन महिने हा ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम संबोधी बुद्ध विहारात नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अत्यंत मंगलमय आणि उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button