कोरोना विषाणू - Covid 19बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमीशेतीविषयक

कामगार गेली पंधरा दिवस आयसोलेशन मध्येच आहेत, त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यासाठी येत्या ३-४ दिवसांत निर्णय घ्या―पंकजा मुंडेंची सरकारकडे मागणी

ऊसतोड कामगारांच्या प्रति आपलं कर्तव्य!! पंकजाताई मुंडे …पुन्हा एकदा सरकारकडे आग्रही मागणी

मुंबई दि. १०:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत अडकलेल्या ऊसतोड कामगारांना आपापल्या घरी सुरक्षितपणे पाठविण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या प्रति असलेल्या कर्तव्य आणि काळजीपोटी पुन्हा एकदा सरकारकडे आग्रह धरला आहे. ऊसतोड कामगारांचा विषय अत्यंत महत्वाचा व संवेदनशील आहे, तो गंभीर आणि हाताबाहेर जाण्या आधी यात लक्ष घालावे. कामगार गेल्या पंधरा दिवसांपासून आयसोलेशन मध्येच आहेत, त्यांची रॅडमली तपासणी व चेकपोस्ट करावे आणि त्यांना मुळ गावी पाठविण्याचा निर्णय तीन ते चार दिवसांत घ्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ऊसतोड कामगारांचा प्रश्न हा सध्या वेगळ्या दिशेने जात आहे. ऊसतोड कामगारांना कारखान्यांनी काही विशिष्ठ ठिकाणी ठेवले आहे, हेच मुळात आपल्या आयसोलेशनच्या नियमाच्या विरुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी राहत आहेत, त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव लोकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो . मी ऊसतोड कामगारांच्या दररोज संपर्कात आहे, त्यांना वेळोवेळी व्हिडिओ काॅलवर बोलते आणि संयमाचे व शांततेचे आवाहन देखील करते, त्याला ते चांगला प्रतिसादही देतात. परंतु गेल्या एक दोन दिवसांत कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काहीही झाले तरी आम्ही १४ तारखेनंतर थांबणार नाही असा पावित्रा त्यांचा असल्याचं त्या म्हणाल्या.

जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

दिल्ली येथे जसा स्थलांतरित कामगारांचा प्रश्न निर्माण झाला होता, तसा प्रश्न ऊसतोड कामगारांच्या बाबतीत निर्माण होऊ नये. ऊसतोड कामगारांचाच नाही तर इतर स्थलांतरित कामगारांचाही प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. माझी सरकारला विनंती आहे की, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिव्हिल सर्जन अशी एक समिती तात्काळ करावी आणि त्यांना अधिकार द्यावेत. जिथे कुठे ऊसतोड कामगार स्वतःच्या जिल्हयापासून दूर ठिकाणी राहत आहेत, त्यांची रँडमली आरोग्य तपासणी करावी, कारण ८-१० दिवसांपासून ते कामगार एकाच ठिकाणी राहत आहेत, त्यामुळे त्यांचे आयसोलेशन झालेच आहे. रॅडम टेस्ट केल्यानंतर कुणीच कोवीड 19 पाॅझेटिव्ह नाही आले तर तो पुर्ण ग्रुप हा सेफ धरायला हरकत नाही. त्या ग्रुपला त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देता येऊ शकते आणि कुणी पाॅझेटिव्ह आढळून आले तर नियमाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन, आयसोलेशन व्यवस्थित करता येईल. आणि आवश्यक इलाज ही देता येईल असे त्यांनी सांगितले आहे.

सरकारला सुचविले हे उपाय

पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यासाठी काही उपाय सरकारला सुचवले आहेत.
ज्या ऊसतोड कामगारांना गावी जाण्याची परवानगी दिली त्यांची यादी, त्यांच्या हातावर किंवा गाडया अथवा पासेसवर स्टॅम्प मारून त्यांना रवाना करण्यात यावं. ज्या ठिकाणाहून ते जात आहेत, आणि ज्या जिल्हयात प्रवेश करणार आहेत त्या मार्गावर चेकपोस्ट करावे. मार्ग ठरवून दिला तर ते त्या मार्गाने शिस्तीत जातील. आणि ते ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या रस्त्यांच्या मार्गावर दुसऱ्या जिल्ह्याची सरहद्द असेल तर त्या जिल्ह्यालाही तशी सूचना द्यावी जेणेकरून ते थेट त्यांच्या जिल्ह्यात जातील आणि आपल्या घरी पोहचतील. ऊसतोड कामगारांच्या कामाचं जे स्वरूप आहे त्या कामासाठी सर्व तरुण मंडळी ऊसतोडणी साठी जातात आणि त्यांच्या गावी व घरी सर्व वयोवृद्ध आईवडील व लहान बालके असतात. बीड, अहमदनगर व उस्मानाबाद, जालना व लातूर जिल्ह्याच्या काही भागातून ऊसतोडणीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असले तरी बीड व अहमदनगर जिल्ह्यांतून जाणारी संख्या मोठी आहे. या दोन जिल्ह्यातील काही गावेची-गावे स्थलांतरित होतात व त्या गावात फक्त आबालवृद्ध व लहान बालके राहतात. दोन दिवसांपूर्वी शिरसाठवाडी ( नगर ) येथे ऊसतोड कामगारांच्या दोन वर्षे वयाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली त्यामुळे तिथे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अशी घटना भविष्यात त्यांच्या संयमाचा बांध तोडू नये व अघटिक घडू नये आणि लोकांनी आत्ताच्या कोविड-19 (करोना) च्या विरुध्द लढायच्या ऐवजी लोकांच्या विरुद्ध लढायची वेळ येऊ नये. यासाठी हा प्रश्न व्यवस्थित हाताळल्यास ते कामगार सुरक्षित घरी पोहचतील आणि यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button